गुरुवार, ३० जून, २०११

दिव्याची वात.....

       स्वार्थाने बरबटलेल्या या जगात चांगलेही लोक काही कमी नाहीत.    पण त्या चांगुलपणाची त्यांना चांगलीच किंमत मोजावी लागते, या किमतीच्या अदायगीसाठी पराकोटीची हिम्मत लागते. सगळेजण त्या चांगुलपणाचा फायदा उचलायला तर सरसावून पुढे होतात पण जेव्हा काम निघून गेलेले असते तेव्हा मात्र त्यांना या चांगल्या लोकांची साधी आठवण सुद्धा येत नाही !!! किती कमालीचे जग आहे हे ! लोक चांगली कामं  करण्याचा मनोभावे संकल्प करतात आणि मग त्याची किंमत मोजायची वेळ आली कि मात्र मग पळ काढतात !!! असो, चांगुलपणात स्वतःचा बळी देणाऱ्या पण आपला भोवतालचा अंधार हटवणा-या  दिव्याच्या वातीची हिम्मत पहा नं,

दुसऱ्याला उजेड देण्यासाठी
दिव्याची वात स्वतः जळते
या जगात चांगुलपणाची 
एवढी किंमत मिळते !!!   

बुधवार, २९ जून, २०११

जीवनाचा खरा अर्थ......

     हे जीवन निरतिशय सुंदर आहे, त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या अनेकांनी केल्या पण तेवढ्यामध्ये मर्यादित होईल ती जीवनाची संकल्पना कसली ? ह्या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करणारे, जिंदगी कैसी ही पहेली म्हणणारे आणि जीना इसी का नाम है म्हणणाऱ्या प्रत्येकाला या जीवनाचा जिवंत साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपापल्या रचनांमध्ये तो व्यक्त करण्याचा प्रयत्नदेखील केला...पण मला वाटतं या जीवनाचा अर्थ कुणालाही तेव्हा कळतो जेव्हा ते अत्तराच्या कुपीतल्या अत्तराप्रमाणे भुर्रकन उडून जाण्याच्या तयारीत असते....
आयुष्यभर उगीच आपण 
सावल्यांच्या मागे पळतो 
जीवनाचा खरा अर्थ मात्र 
मृत्युशय्येवरच कळतो !!!

मंगळवार, २८ जून, २०११

जबान संभाल के ........

शब्द...भावना व्यक्त करण्यासाठीचं माध्यम..परंतु हे माध्यम जितकं  सोपं , सहज तितकंच ते घातक आणि भयंकर सुदधा  ठरतं !!! दुखऱ्या मनाच्या वेदना शमवणारे हेच शब्द कधी कुणाच्या मनोवेदनेचे कारण बनतात, त्यांना जशी भावनेची ओल असते तशीच त्यांना काळीज कापणारी  तीव्र धार सुद्धा असते म्हणूनच म्हणतात, ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकले !!!

कधी शब्द सुखावून जातात
कधीजिव्हारी लागत जातात
शब्द आपले असतात तेच
अर्थ मात्र वेगळे निघत जातात.....

म्हणून जरा ''जबान संभाल के ........!!!!!!!!!''

रविवार, २६ जून, २०११

प्रेमात पडल्यावर...

प्रेमात पडलेल्या लोकांचं काही खरं नसतं म्हणूनच त्यांना कोणी वेडे, कोणी दिवाने आणि कोणी पागल म्हणते, ते कधी स्वतःशीच गप्पा मारतात, कधी एकटेच हसतात, कधी भेट झाल्यावर बोलायच्या वाक्यांची मनोमन रिहर्सल करतांना जगाला विसरून जातात, कधी कधी तर धम्मालच होते...कशी ते पहा....
जायचं असतं एकीकडं 
मन वळवतं तुझ्याकडं 
लोक म्हणतात प्रेमापायी
शहाणं माणूस झालं येडं....


     आजकाल कोणासाठीही कुणाकडे जरासुद्धा वेळ नाही. प्रत्येकाने आपापल्या विश्वाभोवती कुंपण लाऊन घेतले आहे. हा मर्यादितपणा, संकुचितपणा या नव्या जगाचा नवा कायदा होऊन गेला आहे. पण असं बंदिस्त होऊन चौकटीत राहणे पटत नसणाऱ्या आपल्यासारख्याचं काय ??? तर तो आपला स्वभावदोष आहे...आपल्यालाच या नव्या पद्धतीत राहणे पसंत नाही....म्हणून असे जग अशा लोकांनाच लख लाभ असो...आपल्या ला जे जमत नाही ते जमतच नाही...काय करणार ?????

आज सगळेच संकुचित इथे
आणि ज्याचा त्याचा कोश आहे
आपल्याला असं पटत नाही
हा आपलाच स्वभावदोष आहे !!!!

शुक्रवार, २४ जून, २०११

क्षितीज....

     असं म्हणतात प्रेमापुढे भल्याभल्यांना झुकावं लागतं, आणि ते खरंही आहे. ढग एवढे उंचावरून जातात पण धरणीची साद त्यांना बरसायला भाग पडते, माणूस मग तो एखादा पहिलवान जरी असला तरी तो त्याच्या लहान मुलाने  हाताला धरून खाली बसवले तरी चित् झाल्यासारखा खाली पडतो !!! ही ताकद बाहूंची नसते तर प्रेमाची असते . सृष्टीतही अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात..आता क्षितीजाचच पहा ना,  

पृथ्वीवरच्या प्रेमाखातर
आभालालाही झुकावं लागतं
क्षितिजाचं रूप घेऊन त्याला
हातावरती टेकावं लागतं....









गुरुवार, २३ जून, २०११

प्रवासात भेटणारे.....

                प्रवासात असंख्य अनोळखी चेहरे भेटतात...आपले नसूनही ते आपले वाटतात...कधी कधी तर आपण त्यांना आधी कुठेतरी भेटल्याचा भास होतो...आणि कधी कधी तर हे अनोळखी अपरिचित असूनही जवळ बसून जवळचे होतात आणि वाटतं की ज्यांना आपण आपले म्हणून जवळीक करायला जातो ते कधीच मनाने आपले होत नाहीत...सुरक्षित अंतर ठेवून राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात...अशावेळी मला वाटतं....

               कोण म्हणतं प्रवासात भेटणारे
               आपले कधीच कुणी नसतात
               आपले आपल्यापासून दूर
               परके तरी जवळ बसतात... 

मंगळवार, २१ जून, २०११

मनातला पाऊस...

          पाऊस....मनातला मन भरून बरसणारा आणि मन भरून आणणारा...पावसाचा आणि जुन्या आठवणींचा संबंध तसा जास्तच जवळचा....ढग दाटून येतात तशा आठवणीही दाटतात...वाऱ्याच्या झुल्केनेही ढग जसा झरतो तसंच मन भरून आलेलं असलं की डोळ्यांनाही धार लागते...का हा पाऊस नेहमीच एवढा आपला एवढा जवळचा वाटतो ??? का कुणास ठाऊक ? त्याचं आपल्याशी एक शब्दातीत नातं असतं....ते नातं म्हणूनच पावसाची वाट आतुरतेनं पाहायला लावतं.....
            
              सखे तुझ्या आठवणींच्या
              आज सरींवर सारी आल्या
              मरून खोडप्राय भावना
              परत एकदा ओल्या झाल्या.....

बोलणं प्रेमातलं...

    प्रेमात असणाऱ्यांची एक वेगळीच दुनिया असते. त्यात फक्त दोघांपुरतीच जागा असते. त्या दोघांचा एकमेकांवर तेवढा विश्वासही असतो. म्हणून त्यांच्यात खरं खोटं बोलणं असा काही प्रकारच नसतो. जे काही बोलणं होतं ते फक्त दोघांनाही बरं वाटत असतं. अगदी थापासुद्धा खऱ्या वाटतात !!!

खोटं खोटंच बोलणं तुझं
मला मात्र खरं वाटतं
खरं खोटं तूच जाणो
मला मात्र बरं वाटतं...!!! 

रविवार, १९ जून, २०११

आई...

         या जगातला सगळ्यात सुंदर शब्द म्हणजे आई...आणि सर्वात पवित्र गोष्ट म्हणजे तिचे निरपेक्ष प्रेम...आपली आई आपल्याला नेत्रांचा दिवा करून आणि हातांचा पाळणा करून लहानाचं मोठं करते...कधी यशोदा होऊन आपल्या खोड्या माफ करते तर कधी श्यामची आई होऊन शिस्तीचे धडे देते...नुसते हळवे न बनवता कठीण प्रसंगात खंबीर होण्याचं बळसुद्धा तीच आपल्याला देते...

छोट्या मोठ्या संकटांनी जेव्हा 
आपलं अवसान गळून जातं 
नुसतं 'आई' म्हटलं तरी 
भयं कुठल्या कुठं पळून जातं....

शनिवार, १८ जून, २०११

          जगात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. आपण विचार करतो एक आणि होऊन बसते मात्र वेगळेच !!! कधीच ठरवल्याप्रमाणे काही होत नाही. आपल्या बाबतीत हे सगळं जाणून बुजून तर होत नसेल न असं, कोणी मुद्दाम तर असं आपल्याशी वागत नसेल न असं ? या प्रश्नाचे एक उत्तर म्हणजे आपल्याशी असं खेळणारी असते नियती , मांजर जसा उंदराशी खेळ खेळून थकल्यावर त्याची शिकार करते तद्वतच क्रूर खेळ नियतीही आपल्याशी खेळत असते....

                                                         नियती आणि माणसाचा

संबंधच असतो केवढा ???
माकड आणि मदारी यांचा
खेळ असतो तेवढा.... 

शुक्रवार, १७ जून, २०११

           आपल्या पैकी प्रत्येकाचाच ईश्वराच्या ठाई भाव हा असतोच. हा ईश्वर आपल्या सगळ्या दुःखातून आपली सोडवणूक करील हा विश्वास अगदी दृढ असतो. पण हा भाव, ही भक्ती एखाद्या दुःखाच्या लाटेने आहत झाल्याशिवाय तेवढीशी बळकट होत नाही. संकटात,दुःखात,अडचणीत सापडल्यावर आपण त्याला यातून सोडवण्याची विनंती करतो,साकडे घालतो पण सुखाच्या काळात कधी आपल्याला त्याची आठवण येत नाही !! मग आपण त्याला आठवावं म्हणूनच तर कदाचित दुःख ही त्याचीच एक योजना तर नसेल....


                                                              भक्तीच्या मुळाशी दडलेली
                                                                 एक मुकी वेदना असते
                                                             दुःखातच त्याला आठवावं
                                                                अशी देवाचीच योजना असते...

गुरुवार, १६ जून, २०११


आजची माझी चारोळी.....
      आयुष्याच्या एखाद्या वळणावर कोणी तरी आयुष्यात येतं, त्याचं येणं जगण्याची दिशाच बदलून टाकतं, सगळं जग उत्सव साजरा करीत असल्याचा रुपेरी भास व्हायला लागतो, आपण स्वतःवर जास्त प्रेम करायला लागतो, जगण्याच्या प्रेरणेला कारण सापडलेलं असतं, त्या एका व्यक्तीसाठी जगाशी टक्कर घ्यायची सुद्धा तयारी असते, तिच्या सहवासातला प्रत्येक क्षण मनात गोन्दनासारखा कोरल्या गेलेला असतो पण......अचानक त्या व्यक्तीची आणि आपली नकळत ताटातूट होते आणि मन उदासून जातं,जे कधी मिळालंच नव्हतं तेच हरवल्याची जाणीव मन अंधारून टाकते तेव्हा....आपण व्यथित होऊ नये, ही  पृथ्वी गोल आहे जो जातो तो परतही येतोच आणि जिथे ऋणानुबंध असतो तिथे तर कधी जाणाऱ्याला अडवूच नये का ते पहा.....
                                                                    
                         जाणाऱ्याला कधी अडवू नये
                    आपल्याच मनाला घालावा आवर            
                    जाऊन जाऊन जाईल कोठे ???
                    ऋणानुबंध असल्यावर....


   

बुधवार, १५ जून, २०११

आजची माझी चारोळी....

कधी कधी आपण एखाद्या चिंतेने ग्रासले जातो.आपल्या सभोवतीच्या कोणत्याही गोष्टी आपल्या मनाला सुखावू शकत नाहीत, आपल्या मनातील व्यथा मनाचा गाभारा अंधारून टाकते , तेव्हा आपण स्वतःला एका अनामिक कोषात गुरफटून घेऊन आतल्या आत जिरत असतो अशा वेळी धीर न सोडता परमेश्वरावर सगळी चिंता सोडून देउन निश्चिंत व्हावे. त्या सख्याला मनीच्या चिंता सांगितल्याने आपले मन हलके तर होतेच पण पुन्हा नव्या संकटांना तोंड देण्याची उर्जा आपल्या मनाला मिळते म्हणूनच मला वाटतं.......
                                                        
                                                   सगळी दुःखं संपून जातात
                                                   विश्वास ठेवावा वरच्यावर 
                                                   दगडाचाही परीस होतो 
                                                   'त्याची' एक नजर पडल्यावर.....
                                   
                                                 पटत नसेल तर आजमावून पहा...

सोमवार, १३ जून, २०११

माझी आजची चारोळी...

आपण जे काही लिहितो, आपल्याला जे काही सुचतं, ती आपली प्रतिभा आहे असंच आपल्याला वाटत असतं,पण हे सगळं आधीच कुठेतरी अस्तित्वात असतं फक्त आपल्याला त्याचा एका निश्चित वेळी साक्षात्कार घडतो आणि ती कल्पना शब्दाचं रूप लेवून कागदावर अवतरित होते...म्हणूनच 'तो' आपल्याला या आविष्कारासाठी निवडतो आणि आपण त्या लिखाणाचं माध्यम बनतो.......हाच ईश्वर आपल्यासारख्या नगण्य यःकश्चित लोकांना खूप काही देतो आपण मात्र त्यालाच त्यातून थोडासा देवून भूलवायला बघतो...!!! या विसंगतीवर सुचलेली ही चारोळी खास आपणा सर्वांसाठी....
                                ''मोठ्या भेटी मोठे हार वाहून
                                 दानशूरपणाचा आव आणतात,
                                 त्याचंच घेऊन त्यालाच देण्यात
                                 लोक धन्यता मानतात !!!"