गुरुवार, २१ जुलै, २०११

मन भावना...

     कोणतेही काम करतांना, कोणताही निर्णय घेतांना अगोदर आपण डोक्याने विचार करतो. नेहमीच आपण सगळ्या शक्यता तर्काच्या कसोटीवर जोखून पाहतो. त्या गोष्टीच्या नफा नुकसानीचा विचार करतो, त्यानंतर त्या बाबतीतला निर्णय घेतो पण तो घेतल्यावरही आपला मेंदू स्वस्थ बसत नाही परत शंका कुशंका आपल्या डोक्यात येतात आणि आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडवतात. म्हणजे काय होते, विचार डोके करते आणि शिक्षा बिचाऱ्या मनाला भोगावी लागते, त्यात त्याचा दोष नसतांना !!! म्हणून मला असे वाटते कि, आपण नको एवढे महत्व डोक्यालाच न देता थोडा मनालाही भाव द्यावा कारण आपलं मन वेळोवेळी आपल्याला भल्या बु-याची जाणीव करून देतच असते ना. पण आपण मनाचे सल्ले नेहमीच भावनिकता म्हणून बाजूला सारून तर्काधिष्ठित निर्णय घेण्यातच धन्यता मानत असतो...

डोक्यानेच विचार करू नये
कधी मनालाही वाव द्यावा,
गणिती हिशेब बाजूला ठेवून
भावनांनाही भाव द्यावा....

बुधवार, २० जुलै, २०११

प्रेमाची बेरीज...

     प्रेमाच्या विश्वातल्या संकल्पना आणि गणित  काही तरी औरच!!! भूमिती मध्ये एकरूपता नावाचा एक प्रकार असतो, त्यात काही ठराविक रेषा काही रेषांची आणि काही कोन काही कोनांशी एकरूप असतात पण प्रेमाच्या भूमितीतही ही एकरूपता प्रकर्षाने जाणवते. तो आणि ती दोघे एकमेकांना अनुरूप असले की मग ते एकरूप होतात.आणि इतके एकरूप होतात की अगदी एकरूप होतात. प्रेमाच्या या गणितात बेरीज आणि वजाबाक्याही  अशाच काहीशा सारख्या काहीश्या वेगळ्या... प्रेमाच्या बेरजेत एक तो आणि एक ती मिळून दोन हे उत्तर येत नाही तर उत्तर एकच येते आणि वजाबाकीत दोघांपैकी एकजरी दुसऱ्याला सोडून गेला तर मात्र उत्तर शून्य येते म्हणजे बाकी काही शिल्लकच राहत नाही..!!! सगळं काही संपून जातं.

प्रेमाची अनोखी बेरीज
एक आणि एक मिळून एकच होते,
दोघांमधून एक गेल्यास
वजाबाकी मात्र शून्य येते...!!!!

मंगळवार, १९ जुलै, २०११

दिसतं तसं नसतं...

    आपले डोळे आपल्याला जे दाखवतात ते आणि तेवढेच आपण बघतो अन तेच सत्य तेच खरे असे आपण मानतो. पण बऱ्याचदा हे डोळे आपली बेमालूम फसवणूक देखील करतात, मग आपण म्हणतो माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसत नाही..! म्हणून नेहमीच डोळ्यांवर १०० टक्के विश्वास कधीच टाकू नये ? दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी असतातच असे नाही आणि असणाऱ्या सगळ्या गोष्टी दिसतीलच असेही नाही. क्षितीज डोळ्यांना दिसते, मृगजळ डोळ्यांना दिसते पण मुळात ते अस्तित्वात असत नाही, आणि परमेश्वर, आपली बुद्धी दिसत नाही पण म्हणून काय आपण त्यांचे अस्तित्व नाकारू शकतो का ? एकवेळ परमेश्वराचे अस्तित्व नाकारणारे बुद्धीजीवी भेटतील पण बुद्धी आहे हे तेही नाकारू शकणार नाहीत. म्हणून नजरेच्या भूल भुलैयात कधी तर्काची साथ सोडू नये ...

                       आपल्या डोळ्यांना जे दिसतं
                       ते नेहमीच खरं असत नाही,
                       कधी कधी जे खरं असतं
                       ते उघड्या डोळ्यांनीही दिसत नाही...!!!

रविवार, १७ जुलै, २०११

आपलं दुःख आणि 'तो'

     दुःख नेहमीच नकोसं वाटणारं...पण तितकंच अपरिहार्य. आपल्यापैकी प्रत्येकालाच आपापलं दुःख इतरांपेक्षा थोडं जास्तच वाटत असतं. मग हे दुःख आपल्याला परमेश्वरानच दिलं म्हणून आपली तक्रार सुरु होते. वेळोवेळी त्यासाठी ईश्वराला हजारदा जाब विचारला जातो. दुःखाला माप असतं तर लोकांनी नक्कीच त्याची मोजदाद करून पाहिली असती पण प्रत्येक गोष्टीसाठी रडण्याचा मानवी स्वभावाच आहे. पण मला वाटतं आपल्याला मिळालेलं दुःख हे सोसण्याइतकंच असतं. आपल्या सोसण्याची मर्यादा संपली की तो त्यातून आपली मुक्तता करतो...


सोसेल एव्हढेच दुःख
'तो' आपल्याला देतो
तेवढं सोसून झालं की,
जवळ बोलावून घेतो...

शनिवार, १६ जुलै, २०११

मोह आणि मन...

       अनादिकालापासून मानवी मन आणि मोह यांचा घट्ट संबंध आहे. सृष्टीच्या निर्मितीच्या बायबल मधल्या अॅडम आणि इव्ह यांच्या कथेत मोहाचे ते फळ खाण्यासाठी मनाई केलेली असतानाही इव्ह ते फळ खाते आणि तेंव्हापासून दुःखास जबाबदार होतात. रामायणात वनवासात असतांनाही सीतेला एक राजकन्या आणि एक राज पत्नी असूनही एका सोन्याच्या हरणाचा मोह झालाच आणि पुढचे रामायण घडले, महाभारतात आपल्याला सत्ता मिळावी या मोहापायी दुर्योधनाने आपल्या कुलाचा विनाश ओढवून घेतला या सगळ्या उदाहरणांतून एकच गोष्ट समजते ती म्हणजे मानवी मन आणि मोह यांच्यात एक घटत वीण असलेले नाते आहे तेच नाते चारोळीतून व्यक्त करण्याचा मोह मलाही आवरता आला नाही...काय करणार मीही एक माणूसच आहे ना...!!!

              मोह आणि मनाचं
              अजबच असतं नातं,
              आधी मनात मोह येतो
              मग मन मोहात गुंतत जातं...

शुक्रवार, १५ जुलै, २०११

तस्मै श्री गुरुवेनमः

    आपल्याला जगात येतांना डोळे मिळालेले असतात पण त्या डोळ्यांनी आजूबाजूच्या जगाचे केवळ अवलोकन करता येते पण खरी दृष्टी मात्र देते ती आपली आई, जगातली सगळ्यात प्रथम वंदनीय गुरु. त्यानंतर शिक्षण देऊन आपल्या नजरेला विश्वात विखुरलेले ज्ञानकण आपल्या प्रकाशातून दृश्य स्वरुपात दाखवणारे आपले शिक्षक आपले गुरु ते आपल्या नजरेला अस्तित्वात असतांनाही न दिसू  शकणारे अणु रेणू जसे एखाद्या खिडकीतून येणाऱ्या प्रकाशाच्या झरोक्यात दृश्यमान होतात तसा ज्ञानाचा प्रकाश प्रदान करतात अन आपले जीवन उजळून काढतात, त्यांच्याच कृपा प्रसादामुळे आपल्या चित्तास एकाग्रता आणि शांतता प्राप्त होते आणि धकाधकीच्या आजच्या जीवन शैलीतून काही काळासाठी शिथिलता प्राप्त होते...आज गुरुपौर्णिमा...गुरूंच्या कृपेचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस...त्यांच्या ऋणातून मुक्त होणे तर निव्वळ अशक्य !!! पण निदान आपण कृतज्ञता तरी व्यक्त करणे आपले आद्यकर्तव्य आहे म्हणूनच त्यांच्या चरणी माझी आजची चारोळी...

गुरूंच्या कृपाशीर्वादाने
मनाची अस्थिरता निवांत होते,
अवखळ झ-यांची खळखळ जशी
सरीतेत मिळाल्यावर शांत होते...

पाऊस आणि तू ...

     प्रणय  आणि पाऊस यांचा संबंध अगदी कालिदासाच्या मेघदूत पासून, मर्ढेकरांच्या कवितांपर्यंत आणि ग्रेस पासून संदीप खरेपर्यंत सगळ्यांनाच आपल्या मोहिनीत कैद करणारा. या पावसाच्या बरसण्याचा आणि प्रेमिकांच्या भेटीच्या ओढीने तरसण्याचा जो शृंगारिक भाव या सगळ्यांच्या काव्यातून उमटला तो केवळ अप्रतिमच ! पण या प्रतिभेला प्रेरणा देणारा पाऊस आणि त्या पावसातली त्या दोघांची चिंब भेट खरच खूप रोमांचक. अगदी आयुष्यात आलेल्या आणि येणाऱ्या सगळया पावसाळ्याच्या ऋतूंत पुरेल एवढी रोमांचाची शिदोरी देणारा तो क्षण... आजपर्यंत सगळ्याच कवी मनांना लिखाणाची प्रेरणा देतो...
                 मला भेटायला जेंव्हा तू
                 पडत्या पावसात यायचीस
                 मन माझं चातक अन
                 तू पाऊस होऊन जायचीस...

गुरुवार, १४ जुलै, २०११

तू समोर असतांना...

         कधी कधी आपलं आवडतं माणूस समोर असूनही डोळे मात्र त्याला मनात साठवून घेण्यासाठी आसुसलेले असतात. मग सगळ्या जगाचा चक्क विसर पडतो. फक्त आणि फक्त मग त्याच्या \ तिच्या डोळ्यात स्वतःचा शोध घेण्याचा खेळ !!! या खेळात आपण इतके रमून जातो की मग आपण आपल्यापासून खुपच दूर निघून जातो, मग परत जागेवर यायला मात्र वाटच सापडत नाही, पण हा शोधण्याचा आणि हरवण्याचा खेळ खेळण्यात एक वेगळीच गम्मत असते.

तू समोर असतांना
तुला डोळे भरून पहायचो,
तुझ्या गहिऱ्या डोळ्यात मला शोधतांना
मीच हरवून जायचो...

बुधवार, १३ जुलै, २०११

अश्रू आणि वेदना...

     अश्रू आणि वेदना या तशा दोन भिन्न बाबी पण त्यांच्यात एक सारखेपणा असा की त्यांच्या असण्यात कधीच काही फरक पडत नाही. वेदना ही कधीच सुखद असू शकत नाही आणि अश्रू कधीच गोड असू शकत नाहीत. मग वेदना प्रेमळ माणसाकडून मिळालेली असो नाहीतर अश्रू  आनंदात निघालेले असोत !!! या अश्रूंचं आणि वेदनेचं एक अनामिक पण अतूट असं नातं आहे, शरीर असो वा मन वेदना होताच अश्रू  अगदी सहज बाहेर पडतात. जणू काही तशी व्यवस्थाच असते...काही जन म्हणतील की आनंदात सुद्धा अश्रू  येतात ना मग वेदनेशी अश्रूंचं अतूट नातं कसं काय ? तर पहा असं म्हणणा-या लोकांसाठी हे उत्तर...

अश्रू आणि वेदना यांचं
कोण म्हणतं नातं नसतं,
वेदना झाल्याशिवाय कधी
डोळ्यात पाणी येत नसतं....